जगात दोन गट आहेत. उघड्यावर शी करणारे आणि उघड्यावर शी न करणारे. पहिल्यातल्यांना दुसर्यांच्या ठिकाणी होत नाही, आणि दुसर्यातल्यांना पहिल्यांच्या ठिकाणी! खेडोपाड्यात कितीही सिमेंट कॉंक्रिटाची शौचालये बांधून दिली, रेडिओवर उघड्यावर करून नये या आशयाच्या जाहिराती वाज़वल्या तरी उघड्यावर करणे काही थांबत नाही. एक तर त्यांना त्याची सवय असते, आणि त्यांना आत (शौचालयात) करायला हरकत असते असे नाही तर ते गेले तरी त्या बंदिस्त ठिकाणी त्यांना होतच नाही. सवय हे कारण तर आहेच. ज़शी उघड्यावर शी न करणार्यांमध्ये भारतीय शैलीची सवय असणार्यांना पाश्चात्त्य शैलीच्या कमोडवर भारतीय पद्धतीने बसल्याशिवाय होत नाही, तशीच उघड्यावर करणार्यांना आत (कसेही) बसून होत नाही.
आज़ही खेडोपाड्यांमधून हगंदरी अशी ज़ागा असतेच. आणि खोडोपाड्यात नाही तर रेल्वेने प्रवास करतांना तर अनेक ज़ण बसलेले दिसतात. काही ज़ण जे उगाच का उभे आहेत असे वाटतात, ते खरंतर रेल्वे प्रवाशांच्या लाज़ेने करता करता उठून उभे राहिलेले असतात. म्हणजे आधी ते उपविष्टच (‘उपविष्ठ’ ही बहुधा) असतात. रेल्वेने त्यांचे उत्थान केलेले असते. पण काही कोडगे म्हणा किंवा निर्भीड म्हणा किंवा "काय च्यायला प्रत्येक रेल्वेला राष्ट्रगीताला मान दिल्यागत उभं राहायचं! त्यापेक्षा बसा करत" असा विचार करणारे म्हणा, किंवा "ज़ाऊ द्या ना राव! बघू दे साल्यांना! आपली परत कुठे त्यांच्याशी गाठ पडणार आहे आणि बघितली तरी आपली सध्या पिवळीच आहे आणि आपलीच लाल असा सध्या तरी आपला दावा नाहीये" असा विचार करत बसूनच असतात. हीच ती निर्विकल्प समाधी! त्यांना अनेकांप्रमाणे या सुविचाराने पछाडलेले असते "त्यागाच्छान्तिर्निरन्तरम्" [त्यागात् शान्तिः निरन्तरम् = त्यागानेच (येथे मलत्याग) निरंतर शांतीचा लाभ होतो!].
गावकरी सरकारच्या शौचालयांना का भीक घालत नाहीत आणि त्यांची रूपांतरे लवकरच गोठा इ.त का होऊन ज़ातात याचा शोध घेण्यास माझा हैदराबदेतला मानवंशविज्ञानाचा मोठा गंभीर विद्यार्थी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुळम जिल्ह्यातील पोंदुरू तालुक्यातील खेड्यांमध्ये अभ्यासाला गेला होता. तेव्हा उघड्यावर करण्याची सवय आणि सोय दोन्ही गोष्टी असताना असे आत का ज़ात बसावे असा ग्रामस्थांचा खडा सवाल होता. तसेच केवळ गावचे पटील व त्यांच्या स्त्रिया हे मात्र आपले स्वतंत्र शौचालय बांधून त्यातच ज़ातात म्हणजे हे मोठ्या लोकांचे काम आहे, म्हणून त्यांच्यासारखे करावे म्हणून आपणही आत ज़ावे असा कल सुरुवातीला होता खरं काही गावकर्यांचा पण नंतर सवयीने विजय मिळवला व हे असले
Sanskritisation काही घडून आले नाही. उलट पाटीलच आदत से मजबूर होऊन हगंदरीच्या मार्गावर आढळतात. असो. मुद्दा हा की शौचालय ही वास्तू बांधून कामाचे नाही, तर शासनाने संवेदनशील सांस्कृतिक ज़ाण, अंग असणारे डिज़ायनर्स गाठून केवळ
एर्गोनॉमिक्स नाही तर कल्चरल एर्गोनॉमिक्स ergonomics,
Environmental design या सगळ्याच्या पूर्वज्ञानाने ग्रामीण भागात हा उपक्रम राबवायला हवा.
मराठीत हगर्या गप्पा म्हणतात ते अशा गप्पांना ज्या उघड्यावर करतांना मारल्या ज़ातात. वास्तवात आपला सगळ्यांचा असा अनुभव असेल की करताना फार नवनवीन विचार, निर्मितिक्षम विचार, भन्नाट कल्पना (ज़शी की शी वर असा ब्लॉग लिहावा!) मनात येतात . यावर म्हणजेच शी करताना मनात सुपीक विचार का, कसे येतात यावर थोर कन्नड लेखक बीचि यांनी संशोधन केले आहे. त्यावर आगामी एखाद्या लेखात लिहू. तर, हगर्या गप्पा या टाकाऊ आणि टुकार समज़ण्याचे कारण नाही. पण मराठीत त्याला वाईट किंवा derogatory अर्थ आहे खरा!
आपण सगळे किमान एकदा तरी बाहेर उघड्यावर बसलेले असतो. माझा अस्सल मातीतला अनुभव सांगतो. आपण काही regular outside goer नाही! त्यामुळे बराच वेळ होण्याचे नावच नाही. त्यातही दिवस होता. म्हणून कोणी येत तर नाहीये ना, कोणी आपल्याला बघत तर नाहीये ना याची सतत चिंता, कदाचित त्यामुळेच...! त्यातही सामन्यपणे माणूस एखाद्या झुडपाच्या आडोशाशी बसतो त्यामुळे भूचर सरपटणारे प्राणी तर नाहीयेत ना याकडे सतत लक्ष द्यावं लागतं. मुंग्या, मुंगळे हे तर सर्वव्यापी असतात. अशा एक ना अनेक कटकटी. एक तो शरीरधर्म पण किती ऊर्जा घेणार!
रात्रीतर अवघडच होते. झुडपापाशी ज़ाणे कठीण! टॉर्च घ्यावी तर आपल्याला प्राणी दिसतील खरे, पण त्यामुळे ते आपल्याकडे आकर्षितही होतील हा धोका, त्यात आपण प्राणी बघून करणार काय! उभा माणूस झगडू शकतो, हकलू शकतो किंवा पळू शकतो. बसलेला माणूस एखादा दगड त्या दिशेने भिरकावण्यापलिकडे काय करणार! म्हणजे टॉर्च असूनही नसल्यासारखी.
त्यात ही सगळ्यात मोठी गम्मत. कुत्री ज़शी आपलं क्षेत्र ठरवून घेतात. तसंच बहुधा डुकरं आपण या-या भगात करण्यात आलेली संपवणार असं ठरवून असतात. आपण उठायला आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठाप्रमाणे डुकराने त्याचा कार्यभार पार पाडायला एकच! इतकी ही तत्परता. त्यामुळे हे भलतेच बीभत्स आणि किळसवाणे होऊन बसते.